पीएम किसानच्या १८ व्या हप्त्यासाठी हे तीन काम करावे लागणार, कधीपर्यंत मिळणार २००० रुपये

 केंद्र सरकारद्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरु करण्यात आलेली आहे. पीएम किसान सन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांना आतापर्यंत 17 हप्त्यांमध्ये 34 हजार रुपये देण्यात आलेले आहेत. पीएम किसानच्या १८ व्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. शेतकऱ्यांना मात्र आता पीएम किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याची रक्कम मिळण्यापूर्वी तीन कामं करावी लागणार आहेत. ई-केवायसी, आधार क्रमांक आणि बँक खाते लिंक करणे आणि शेतजमीन पडताळणी करणं आवश्यक आहे.  ज्या शेतकऱ्यांच्या या तीन बाबी प्रलंबित असतील त्यांना त्या पूर्ण कराव्या लागणार आहेत. 

पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यापूर्वी काय करावं लागेल?

पीएम किसान सन्मान योजनेची सुरुवात डिसेंबर 2018 मध्ये करण्यात आली होती. पीएम किसान सन्मान योजनेद्वारे दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन हप्त्यांमध्ये  2000 रुपये प्रमाणं 6 हजार रुपये पाठवले जातात. आतापर्यंत 17 हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आलेली आहे.मात्र, काही शेतकऱ्यांची कागदपत्रांची पूर्तता नसल्यानं त्यांना काही हप्त्यांची रक्कम मिळालेली नव्हती. आता शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याची रक्कम मिळवण्यापूर्वी ईकेवायसी करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ईकेवायसी केलेली नसेल त्यांनी ती करुन घेणं आवश्यक आहे. यासोबतच शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याला आधार कार्डशी सलंग्न करुन घेणं गरजेचं आहे. तर, शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन असल्याची पडताळणी देखील करणं गरजेचे आहे. 

ई केवायसी कशी करायची? 

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून 18 व्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ईकेवायसी करणं गरजेचं आहे. शेतकरी जवळच्या सीएससी केंद्र किंवा पीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटला भेट देऊन ई केवायसी करु शकतात. 

पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार? 

पीएम किसानच्या १८ व्या हप्प्याची रक्कम 18 जूनला जारी करण्यात आला होता. आता 18 व्या हप्त्याची रक्कम ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हजार रुपये पाठवण्याचा सरकारचा प्रयत्न असू शकतो. 

दरम्यान, पीएम किसान सन्मान योजनेतील शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी पीएम किसान ई मित्र सुरु करण्यात आलं आहे. पीएम किसान ई मित्र हा चॅटबॉट आहे.  याद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. ही सुविधा 24 तास सुरु राहील. मोबाईलवरुन देखील याचा वापर करता येईल.

Leave a Comment